वारकऱ्यांच्या दिंडीला पिक-अपची धडक; 2 वारकऱ्यांचा मृत्यू, 20 जखमी

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात  झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 20 वारकरी जखमी झाले आहेत. कान्हे फाटा येथे हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तर आरोपी पिक अप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  ही दिंडी खालापूर येथून आळंदीकडे जात होती, त्यावेळी हा अपघात झाला. कामशेतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सविता वाळकू येरभ (वय 58, रा. उंबरे, खालापूर, रायगड),  जयश्री आत्माराम पवार (वय 54 रा.भूतवली, ता. कर्जत, जि रायगड) हे दोन वारकरी  उपचारादरम्यान मृत झाले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्गावर कार्तिकी एकादशीला आळंदीकडे खालापूरच्या उंबर गावातील वारकऱ्यांच्या पायी दिंडीला कान्हे फाटा येथे भीषण अपघात झाला आहे.

रायगड येथील माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्यातील हे वारकरी होते. मुंबई पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेला वारकरी मार्गस्थ होत असताना कान्हे फाट्याजवळ मुंबईकडून भरधाव वेगाने आलेली पिकअप गाडी पायी दिंडीच्या मधोमध घुसली. त्यामुळे दिंडीत एकच कल्लोळ झाला, तर जखमी रस्त्यावर विव्हळत होते. या अपघातात दिंडीत सुमारे 200 वारकरी असल्याची माहिती वडगांव मावळ पोलिसांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.