नवी दिल्ली : स्त्री-पुरुषांच्या संख्येच्या गुणोत्तरावर आधारित आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये भारताचे स्थान 4 अंकांनी घसरले असून भारत 112 व्या क्रमांकावर आहे. महिलांचे आरोग्य आणि अस्तित्व आणि आर्थिक सहभागाच्या संदर्भात असमानतेत झालेल्या वाढीमुळे भारताच्या क्रमवारीमध्ये ही घसरण झाली आहे. महिलांचे आरोग्य आणि आर्थिक सहभाग या दोन मुद्दयांबाबत भारत आता तळाच्या 5 देशांमध्ये गणला जाणार आहे. “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चा जेंडर गॅप रिपोर्ट मंगळवारी प्रसिद्ध झाला. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे.
आइसलॅंड हा जगातील सर्वात लिंग-तटस्थ देश आहे. तर भारत गेल्या वर्षीच्या 108 व्या क्रमांकावरुन खाली घसरला आहे. आता चीन (106), श्रीलंका (102), नेपाळ (101), ब्राझील (92), इंडोनेशिया (85) आणि बांगलादेश (50) सारख्या देशांच्या खाली भारताला (112) स्थान देण्यात आले आहे. येमेनची क्रमवारी सर्वात वाईट (153), तर इराक 152 आणि पाकिस्तान 151 व्या स्थानावर आहे.
लैंगिक तफावत बंद होण्यास 2018 च्या आकडेवारीनुसार 108 वर्षे लागू शकली असती. तर 2019 नुसार 99.5 वर्षे लागू शकतील. राजकीय असमानता नष्ट होण्यास 95 वर्षे लागू शकतील असा यावर्षीचा अंदाज आहे. राजकारणासाठी हाच अंदाज गेल्या वर्षी 107 वर्षे इतका होता. मात्र तरीही आरोग्य, शिक्षण, कार्य आणि राजकारण या सर्व बाबींमध्ये पुरुष आणि स्त्रियांमधील समानता येण्यासाठी आयुष्यभर जास्त वेळ लागेल, असाच याचा अर्थ असा आहे, असे या अहवालात म्हटले आहे.