राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभावामुळं विदर्भ, सलंग्न मराठवाडा भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस होवू शकतो. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. तर, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

 

उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ यलो अलर्ट

उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

16 ऑक्टोबर– नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

17 ऑक्टोबर– नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

केरळात परतीचा मान्सून बरसणार

परतीचा पाऊस दक्षिण भारतात पुन्हा पावसाचा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. केरळ राज्यातील पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.कोट्टायम, एर्नाकुलम,त्रिसूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागानं सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परतीचा मान्सून केरळ मध्ये मुसळधार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.