जिल्ह्यातील 10 गावांमध्ये राबविलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा घेणार आढावा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

केंद्र सरकारच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी  केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या जयपूर येथील राष्ट्रीय सनियंत्रण संस्था भारती विकास संस्थेतर्फे मनोज दीक्षित व श्रीमती मोनिका हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे (भूसंपादन), कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते (रोहयो), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे (ग्रामपंचायत), भूमीअभिलेख विभागाचे अधीक्षक श्री. मगर, तहसीलदार जितेंद्र कुवर, बोदवड, चोपडा, पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा नियोजन कार्यालयातील लेखाधिकारी कैलास सोनार आदि उपस्थित होते.

श्री. दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील समिती 20 सप्टेंबर, 2021 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील विविध दहा गावांना भेटी देवून  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, एनएसईपी, आजिविका, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, भूमीअभिलेख, संसद आदर्श ग्राम योजना आदी योजनांचा आढावा घेतील. तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ही समिती भडगाव तालुक्यातील कोळगाव, पिचर्डे, कोठली, पाचोरा तालुक्यातील लोहटार, जामनेर तालुक्यातील खातगाव, माळपिंप्री, बिलवाडी आणि बोदवड तालुक्यातील जलचक्र, साळशिंगी, शिरसाळे या दहा गावांना भेट देवून पाहणी करणार आहे, असे समितीचे समन्वय अधिकारी श्री. लोखंडे यांनी कळविले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.