सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील बराचसा भाग दुर्गम आणि अतिदुर्गम असल्याने आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्यात यावे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील भाग हा गुजरात सिमावर्ती भागात असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा बजावितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पिंपळसोंड, उंबरपाडा, खुंटविहीर, मालगोंदा, खिर्डी, भाटी, करंजुल या अतिदुर्गम भागात अद्यापही आरोग्य सेवा पोहचलेली नाही. या गावांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र मंजूर करण्यात यावेत. त्यात कोरोना सारख्या महामारीच्या आजाराने डोके वर काढले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना तितकेच महत्व प्राप्त झाले आहे. त्यात शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांसह स्तनदा माता, गरोदर माता, विविध वयोगटातील बालक तसेच डिलिव्हरी व उपचार घेणाऱ्या रुग्णाचा ग्रामीण भागातही आरोग्य केंद्र, उपकेंद्राकडे ओढा दिसून येत आहे. परंतु कधी काळी रुग्णवाहिके अभावी प्राणास मुकण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याने तालुक्यातील अंबोडे, उंबरठाण, पांगारणे, मनखेड, बोरगाव, रघतविहीर, मांधा, खोकरविहीर या केंद्राना नवीन रुग्णवाहिका मिळावी, तसेच आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तात्काळ भरावीत अशा आशयाचे निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना नाशिक येथील भेटीप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा गांगोडे यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, बोरगाव, बा-हे, पांगारणे या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे. तालुक्यातील काही आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांची सोय नसल्या कारणामुळे गैरसोय होत आहे. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करण्यात यावा, यासाठी नवीन रुग्णवाहिका देण्यात याव्यात तसेच आरोग्य केंद्रात पूर्ण कर्मचारी पदे भरलेली नाहीत, सद्यस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावी अशी मागणी करत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.