मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारकडून महागाई भत्त्यात 11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 19 लाख अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2021 पासून वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचं बोललं जात आहे. कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.