अखेर ठरलं ; राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा ‘या’ तारखेपासून होणार सुरु

0

मुंबई : राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले असून आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.शाळा सुरु करताना विद्यार्थी व शिक्षक यांचे कोविडबाबत काळजी घेण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळांमध्ये इ.5 वी ते 8 वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. त्यानुसार, येत्या 27 जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते, अशी माहिती त्यांनी दिली.

शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा-मुख्यमंत्री

राज्यातील शाळांच्या गुणावत्तेचा जिल्हा निहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाय योजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन 2025 असे सादरीकरण आज शालेय शिक्षण विभागाच्यावतिने मुख्यमंत्र्यांच्या समोर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्याचे शालेय शिक्षणाचे व्हिजन तयार करित असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छता हा विषयावर अधिक लक्ष देण्यात यावे.आताच्या काळात व्यावसायिक शिक्षण महत्वपूर्ण ठरत असल्याने विद्यार्थ्यांना आठवीपासूनच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात यावे. शैक्षणिक आणि पायाभूत सुधारणा करण्यासाठी दरवर्षाचा कार्यक्रम तयार करावा आणि त्यासाठी दरवर्षी किती निधी लागेल याप्रमाणे तरतूद करण्यात यावी.

राज्यातील शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने शाळांमध्ये फेजवाईज इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावे.मुलांना सध्याच्या शिक्षण पद्धती बरोबरच नैसर्गिकरित्याही शिक्षण घेता येईल का या पद्धतीने शाळेची रचना करावी. यासाठी बोलक्या भिंती यासारखे उपक्रम राबवता येतील का हे सुध्दा पाहण्यात यावे, शाळेची इमारत हे शिक्षणाचे स्थान कसे होईल यासाठी पथदर्शी उपक्रम राबवावेत असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

शालेय शिक्षण विभागाच्या व्हिजन नुसार काम करताना तातडीने हाती घ्यावयाची कामे आणि दीर्घकालीन कामे याचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, तसेच या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कंपन्याचा शोध घेऊन सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत शालेय विकासासाठी काय करता येईल आणि त्यांना शासनाबरोबर कसे जोडले जाईल यासाठी विभागाने प्रयत्न करावा असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

गुणवत्तेकडे वाटचाल : शिक्षीत महाराष्ट्र समर्थ राष्ट्र

शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि शिक्षणाची गुणवत्ता यामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभुत सुविधांसाठी शालेय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे.

शालेय विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण रोखणे, 5 हजार आदर्श शाळांची निर्मिती करणे, शिक्षक भरती यासारखे उद्दिष्ट असलेले शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन 2025 चे सादरीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत आज करण्यात आले. परफॉर्मन्स ग्रेडिग इंडेक्समध्ये सुधारणा करण्यासाठी, शिक्षकांचे उत्तरदायित्व वाढविणे, शासन निर्णय, कायद्यांचे फेरनिरीक्षण व सुलभीकरण करणे, गुणवत्तेवर आधारीत मुख्याध्यापकांची भरती करणे यासारख्या उपाययोजना करणार असल्याची माहितीही सादरीकरणादरम्यान प्रा. गायकवाड यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.